आज शिवराज्याभिषेक दिन. या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.
६ जून १६७४ ला जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला असेल त्यावेळचं वातावरण काय आनंदी, उत्साही असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी काही शतकं फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण हिंद प्रांत हा परकीयांच्या आक्रमणाने पूर्ण खचला होता. आक्रमकांच्या फौजांपुढे आपला टिकाव लागणारच नाही हे गृहीत धरून जवळपास प्रत्येक जण आक्रमकांना शरण गेला होता. अशावेळेला 'स्वराज्य' असावं असं स्वप्न बघायचं, आणि वयाच्या १५ व्या वर्षी स्वराज्याची शपथ घ्यायची आणि पुढे १ वर्षांत तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ करायची.
पुढे जवळपास २९ वर्ष झुंज देऊन एक असं राज्य जिथे आपली संस्कृती, आपली भाषा, यांना कुठलाही अटकाव नाही, आपली करपद्धती, आपली राज्यशासन पद्धती असलेलं एक राज्य उभं करायचं आणि त्याची घोषणा राज्याभिषेकाच्या निमित्ताने जगासमोर करायची. हा दिवस असा दिवस आहे ज्याने पुढे मरहट्ट्यानी हिंद प्रांतावर राज्य केलं, त्याची बीज रोवलीच पण पुढे ब्रिटिशांच्या विरोधात उभारल्या गेलेल्या स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देखील राज्याभिषेक दिनातूनच मिळाली.
या दिवसाची तुलना ही ४ जुलै १७७६ रोजी अमेरिकेतील १३ वसाहतींनी स्वातंत्र्याची घोषणा केली त्याच्याशी होऊ शकते किंवा १४ जुलै १७८९ साली झालेल्या फ्रेंच क्रांतीच्या दिवसाशी होऊ शकते. या दोन्ही घटना घडायच्या आधी जवळपास १०० वर्ष आधी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, ज्यातून त्यांनी स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा विचार रुजवला.
जसं या दोन घटनांनी अमेरिका आणि युरोप यांचा भूगोल बदलला आणि भविष्यच बदललं तशीच ताकद आपल्या शिवराज्याभिषेक दिवसांत आहे.
हा दिवस फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात सण म्हणून साजरा व्हायला हवा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची आस सामान्यांच्या मनात जागृत केली नसती तर ती कदाचित पुढची अनेक शतकं हा हिंद प्रांत खितपत पडला असता. म्हणून हा दिवस राष्ट्रीय सणासारखा साजरा व्हायला हवा.
आणि मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका याच्या पलीकडे जाऊन आपण कोणाचे वारस आहोत याचं स्मरण करत हा दिवस साजरा करावा.
पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा !
राज ठाकरे ।
आज जागतिक पर्यावरण दिन. मागच्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि आजपर्यंतचा उच्चांकी उन्हाळा जो सगळ्यांनी सहन केला या पार्श्वभूमीवर आजच्या जागतिक पर्यावरण दिवसाकडे आपण नेहमीच्या उपचारांच्या पलीकडे जाऊन बघायला हवं. आपल्याकडे सगळ्याच बाबतीत उत्सवी उत्साह असतो. त्यामुळे पर्यावरण दिन आला की झाडं लावून त्याचे फोटोज काढून ते सोशल मीडियावर टाकणे याचा अतिउत्साह असतो. आणि त्यातली ९०% झाडं पर्यावरण दिनाच्या संध्याकाळपर्यंत पण टिकत नाहीत. त्यात काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने काही कोटी झाडं लावण्याची आणि पुढे ती लावून झाली अशी घोषणा केली. ती झाडं कुठे आहेत हे सरकारलाच माहित. असो. पण आजच्या दिवशी तरी सरकारने आणि महाराष्ट्रातील लोकांनी आपण या पर्यावरण बदलाने काय गमावलं आहे आणि काय गमावणार आहोत याचा विचार करायला हवा.
२०१४ साली मी जेंव्हा महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर केला होता तेंव्हा मी फिल्म सादर केली होती. विकासाला सौंदर्याची आणि पर्यावरणाच्या विचाराची जोड नाही दिली तर तो विकास किती वरवरचा आणि पोकळ असतो हे मी त्यात सांगितलं होतं. त्याची साक्ष गेल्या काही वर्षांत तुम्हाला जाणवत असेल. अमुक रस्ता बांधला, तमुक ब्रिज बांधला म्हणून श्रेय घेण्याची आणि ते पाहून खुश होण्याची स्पर्धा सुरु आहे. पण एका पावसाने, तो सुद्धा मान्सूनचा पाऊस नाही, शहराची दाणादाण उडत आहे. आत्ता परवा एका ठिकाणी बातमी वाचली की या उन्हाळ्यात शेतात सकाळी १० नंतर काम करायला जायला महिला पुरुष धजावत नव्हते. याचा अर्थ आपण लावणार आहोत का?
हल्ली सगळ्यांना जरा मोठ्या आकड्यांचं आकर्षण निर्माण झालं आहे. त्यामुळे म्हणलं जरा काही गंभीर आकडे मी पण तुमच्यासमोर ठेवतो.
यावर्षीच्या अति उन्हामुळे देशाच्या प्रॉडक्टिव्हिटीचं झालेलं नुकसान हे जवळपास १५९ बिलियन डॉलर्सचं आहे. अतिप्रचंड उन्हामुळे काम न करू शकल्यामुळे गेल्या काही वर्षात साधारणपणे वर्षाला १६० बिलियन कामाच्या तासांचं नुकसान झालं आहे. पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे देशाच्या जीडीपीत २.५ ते ४.५ टक्क्यांची घट येऊ शकते असा अंदाज वल्ड बँकेचा आहे. एका जागतिक अभ्यासाप्रमाणे देशातील ५७% जिल्हे ज्यात देशाची ७६% लोकसंख्या राहते, हे जिल्हे पर्यावरण बदलामुळे होणाऱ्या जबर हानीच्या काठावर आहेत.
जेंव्हा आपली अर्थव्यवस्था अमुक तमुक क्रमांकाची अशी आकडेवारी टाकतो तेंव्हा या आकडेवारीचा विचार पण करणार आहोत का ?
आज पावसाळ्याचे चार महिने शहरांमध्ये जगणं कठीण होत चाललं आहे, ग्रामीण भागात अतिवृष्टीने हाहाकार उडतो आणि उन्हाळ्याचे चार महिने ग्रामीण आणि शहरी भागांत जगणं असह्य होत चाललं आहे. थोडक्यात आपण जिथे जगतोय तिकडे ८ महिने आपल्याला धड जगता येत नाहीये, याची खंत आपल्याला का वाटत नाहीये? माझा विकासाला विरोध नाही, रस्ते, पूल हे करा ते आवश्यक आहेतच, पण ते करताना आपण आपली शहरं धड जगायला लायकीची करत आहोत का याचा विचार का होत नाही? पावसांत ग्रामीण भागात पिकं वाहून जातात आणि शहरी भागांत गाड्या पाण्यावर तंरगतात आणि तरीही आपण जे सुरु आहे त्याला विकास म्हणून खुश होणार आहोत का?
बरं सध्याच्या केंद्र सरकारच्या काळात गेल्या ११ वर्षांत जवळपास १,७३,९८४ हेक्टर इतकी जंगल जमीन ही खाणी, रस्ते इत्यादींसाठी देऊन टाकली. आणि हे सगळं यांच्या लाडक्या एकुलत्या एक अदानी उद्योगसमूहासाठीच केलं. जेंव्हा देशाचे पंतप्रधान हे पर्यावरण बदलावर मन की बात मध्ये बोलतात तेंव्हा त्यांच्या मनातील खरी गोष्ट ही जंगलांचं, झाडांचं काही का होईना आम्हाला दोन तीन उद्योगपतींनाच मोठं करायचं आहे हीच असते.
१७३९८४ हेक्टर म्हणजे किती याचा अंदाज यावा म्हणून तुम्हाला एक उदाहरण देतो. १.७३ लाख हेक्टर म्हणजे १७३० स्क्वेअर किलोमीटर. आपल्या मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे १०४ स्क्वेअर किलोमीटरचं. ज्याच्यावर आख्ख्या मुंबई आणि परिसराचं भवितव्य अवलंबून आहे. १७३० स्क्वेअर किलोमीटर जंगलाची जमीन गेली म्हणजे साधारणपणे १६ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानं नष्ट झाली.
आज तरुण मुलं-मुली दिवसभर कुठल्यातरी सोशल मीडियावर काहीतरी बघत आहेत, पण त्यांचं काय चुकतंय ? मान वर करून काही बघावं असं धड काहीच नाही आपल्याकडे. आपल्याकडे बागा नाहीत, शहरातील झाडं प्रचंड प्रमाणवर तोडलेली, डोंगर पोखरलेले, नद्या आपणच घाण करून टाकलेल्या, मग जो एकाकीपणा, नैराश्य असतं ते रिल्स बघून घालवतात. माझी या तरुण मुलामुलींना विनंती आहे की जे तुम्ही सोशल मीडियावर बघताय जी जगातील शहरं, तिथला जपलेला निसर्ग हे इथे हवं यासाठी आग्रही रहा. त्यावर व्यवस्थेला जबाबदार धरा, खोटे आकडे, फसवी चित्रं याला भुरळून जाऊ नका. हे जर नाही केलंत तर तुमचं आयुष्य किड्या-मुंग्यांसारखं होईल हे नक्की.
आपण निसर्गपूजक समाज होतो. तो निसर्गपूजक समाज निसर्गविनाशक कधी झाला हेच कळत नाही. आज कोकणात देवराया टिकल्यात कारण त्या तिथल्या निसर्गपूजक परंपरेने टिकवल्यात म्हणून. जोपर्यंत आपण आपल्या मूळच्या धारणेकडे जाणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही. पर्यावरण इत्यादीवर बोलणं, भांडणं हे मूठभर निसर्गप्रेमींचं काम होतं असं आपण मानायचो. पण तो आता तो अर्थव्यवस्थेचा, आरोग्याचा, शेतीचा आणि शहरांच्या भवितव्याचा विषय बनला आहे.
निसर्गातील बदल हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला असे काही विळखा घालून बसलेत की जर आजच काही केलं नाही तर यातून तुम्ही तर सोडाच, पुढच्या पिढ्या पण निसटू शकणार नाहीत. आपल्या पुढच्या पिढीला आपण कसला महाराष्ट्र देणार आहोत? झाडांशिवाय शहरांचा? नदीऐवजी गटारं झालेल्या नद्यांचा ? उन्हाळ्यात घराबाहेर न पडता येणाऱ्या गावांचा? की जगातील सर्वोत्तम शहरांशी स्पर्धा करणारी, हिरव्यागार, सुंदर आणि जगण्यालायक शहरं आणि गावांचा ? याचा विचार आजतरी करायला सुरुवात करायला हवी. आणि हे केलं तरच हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा झाला म्हणता येईल.
राज ठाकरे ।
आज सोशल मीडियावर Cockroach Janta Party ट्रेंड होतंय, ते राजसाहेब अनेक वर्षांपासून ओरडून सांगत आहेत. सरकार येतील जातील सत्तेतील पक्ष बदलतील पण आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्यालाच उभ राहायचं आहे.
या हुकूमशाही आणि फसवणुकीच्या राजकारणाविरोधात आवाज उठवण्याची वेळ आली आहे. जागे व्हा!
सस्नेह जय महाराष्ट्र,
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलं. सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्कफ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा इत्यादी इत्यादी. हे सगळं का ? तर, सोनं, पेट्रोल डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणवर खर्च होते. आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढलेत.
बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही शे गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढत आहेत, स्वतःवर फुलं उधळून घेत आहेत त्याचं काय करणार आहात आपण ? आमच्याकडून चूक झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून, यापुढे माझ्यासकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का ? चुका तुमच्या, आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?
सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव हा साधारणपणे ९० ते १०० डॉलर्स प्रति बॅरल असा आहे. हा भाव जगाने या आधी कधी पाहिला नाही असं नाही.
२००८ ला पुढे २०११-२०१२ मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, २०१३-२०१४ च्या काळात ( जेंव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किंमती आणि देशाची इभ्रत यावर तावातावाने बोलत होते तो काळ ), पुढे अशीच परिस्थिती २०२२ आणि २०२३ च्या दरम्यान जेंव्हा ओपेकने खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा देखील बॅरलचा भाव ९० ते १०० डॉलर्सच्या दरम्यान गेला होता. या घटनांपैकी ३ ते ४ वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते. मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेंव्हा मोदींनी केलं नाही. मग आत्ताच का ? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्याराज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलं आहे त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत. बरं जेंव्हा बॅरलचा भाव ६० ते ६५ डॉलर्सच्या आसपास होता तेंव्हा पण तुम्ही चढ्या भावाने आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले जे काही लाख कोटी रुपये असतील ते कुठे गेले ? त्याचं काय झालं ?
ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली त्याच रेवड्या मग २०२४ ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणूका असोत की इतर कुठल्याही निवडणुका 'रेवड्या' वाटूनच निवडणुका जिंकल्यात. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेने राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली. महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपाने पुन्हा काढून घ्यायचे. देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झाली आहे तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का ?
पेट्रोल, डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात. ठीक आहे. मग हे आत्ताच का सुचलं ? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या त्या राज्यात नेताना जे कोट्यवधी लिटर्स पेट्रोल, डिझेल वाया गेलं तेंव्हा का नाही सुचलं ? या राज्यांमध्ये जो अफाट पैशाचा खेळ करून मतदान मिळवलं तेंव्हा का नाही सुचलं ? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात. पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आत्ता परवडत आहे ? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाही. विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंस वाटतं कारण गेल्या १० ते ११ वर्षांत आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाही भारतात रहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण केलं नाही. शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं.
गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत. एक अंदाज असा आहे जवळपास दीड लाख करोड रुपये गेल्या तीन महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतलेत. भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतात, त्यासाठी थंड हवेच्या देशांत जातात. बरं तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे मग त्यासाठी स्वित्झर्लंडला काय जायचं? स्वतः पंतप्रधान आता १५ मे पासून ५ देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत, हे दौरे तुम्ही थांबवा. आणि मग लोकांना आवाहन करा.
अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो.
ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि एकूणच विवेकाचा आवाज उठवला जायचा आणि त्यामुळेच डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जणं या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे.
हा खरात स्त्रियांचं शोषण करतोय, ते झालं तरी चालेल, पण त्याच्या बदल्यात कुठल्यातरी शक्तीने तो आपलं भलं करेल असा अजब विश्वास आणि यासाठी लागणारा कोडगेपणा हे दोन्ही या राज्यात कुठून आला आहे हेच कळत नाही.
आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे.
आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे.
या सगळ्याचा महाराष्ट्राच्या समाजमनावर काय परिणाम होतोय याचा विचार आतातरी होणार आहे का ? माध्यमं सध्या खरात प्रकरणाचा रोज पाठपुरावा करत आहेत हे चांगलं आहे पण म्हणून त्यांनी जनतेला पुन्हा एकदा आपण कोण होतो याचं दर्शन घडवायला हवं असं मला मनापासून वाटतं. गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मी हा महाराष्ट्र कोणी घडवला आहे याचं दर्शन मुद्दामून करवलं होतं, ती माझी समज काय आहे हे दाखवण्यासाठी नाही. तर आत्ताच्या तरुण पिढीला हे कळावं म्हणून. माझ्यापरीने हे काम मी करत राहणार आहेच.
पण महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा. हे असले लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देणार आहात. महाराष्ट्रातील गावागावांत आजही कीर्तनं होतात, ज्ञानेश्वरीचं पठण होतं, आजही या राज्यात तर्काचा आवाज मोठा आहे. पण जर तुम्ही या असल्या नाठाळांना आपले नेते मानणार असाल तर महाराष्ट्राचं काही खरं नाही हे नक्की.
राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे.
जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेंव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं ? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल.
माझी माध्यमांना विनंती आहे की तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. इतकंच नाही तर खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका.
तुमचं रोजच आयुष्य सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, अगदी बारीकसारीक गोष्टी कशा होणार, त्या चांगल्या होणार की सुमार होणार हे जर राजकारण ठरवणार असेल तर आपल्याला राजकारणापासून अलिप्त कसं राहता येईल ? आज संधी आहे महाराष्ट्राचा पाईक होण्याची... ती संधी गमावू नका, क्यूआर कोड स्कॅन करून किंवा https://t.co/5YZHUQwdZk या संकेतस्थळावर सदस्य नोंदणी करा.
#MNSAdhikrut
माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना,
सस्नेह जय महाराष्ट्र,
आपल्या पक्षाचा उद्या, ९ मार्च २०२६ ला २० वा वर्धापनदिन. मराठी माणूस आणि मराठी भाषा यांच्यासाठी आक्रमकपणे लढणाऱ्या पक्षाचा आणि एका विचाराचा हा वर्धापनदिन. या निमित्ताने पक्षाची सदस्य नोंदणी १० मार्च २०२६ पासून सुरु होत आहे. उद्या ९ मार्च ला मी सकाळी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून माझ्यापासून सदस्य नोंदणीची सुरुवात करत आहे. या रायगडाने महाराजांचं वास्तव्य अनुभवलंच पण 'शिवराज्याभिषेकाचा' साक्षीदार देखील हा किल्लाच.
अशा पावन ठिकाणी जाऊन आपण आपली सदस्य नोंदणी सुरु करत आहोत.
आपली सदस्य नोंदणी ही महाराष्ट्र सैनिकांपुरतीच मर्यादित नाही हे मुळात लक्षात घ्या. तुम्ही सदस्य नोंदणी कराच, पण ज्यांना ज्यांना महाराष्ट्राला आकार द्यायचा आहे, ज्यांना ज्यांना सद्य परिस्थितीबद्दल राग आहे अशा सगळ्यांना आपल्याला, आपल्या नवनिर्माणाच्या ध्यासासोबत जोडून घ्यायचं आहे. तुमच्यासकट जे जे नव्याने आपल्यासोबत जोडले जाणार आहेत, ते आपण सगळे महाराष्ट्राचे पाईक आहोत याचं भान तुम्हीही ठेवा आणि लोकांना पण द्या.
सदस्य नोंदणी डिजिटल स्वरूपात पण करणार आहोत ज्याचा तपशील तुम्हाला १० मार्चला कळलेच, फक्त पक्षाच्या शाखांच्या बाहेर स्टॉल्स लावून चालणार नाही तर सर्व वर्दळीच्या ठिकाणी माझे महाराष्ट्र सैनिक दिसले पाहिजेत , उदा . मार्केट, शाळा , मंदिरं , कॅालेज , मैदानं , बागा वगैरे अशा गजबजलेल्या सर्व ठिकाणी आपली सदस्य नोंदणीची टेबल्स लागली पाहिजेत ! येणाऱ्या जाणाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आपलंस करत ही सभासद नोंदणी करा. यासाठी तुम्हाला जी मदत लागेल ती आपले सर्व पदाधिकारी तसेच शहर अध्यक्ष, उप शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष , सरचिटणीस आणि पक्षाच्या नेत्यांना कळवा ! तसे आदेश मी त्यांना दिले आहेत !
प्रश्न आकड्याचा नाहीये, तशीही आपली सदस्य नोंदणी ही कायम मोठीच होते. पण यावेळेस महाराष्ट्र म्हणून, मराठी म्हणून सामान्य मराठी माणसाची महाराष्ट्राचा पाईक होण्याची इच्छा किती तीव्र आहे आणि सरकार किती चुकीच्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळते आहे याचा राग सर्वांच्या मनात किती आहे हे देखील स्पष्ट होईल ! त्यामुळे जोरदार सदस्य नोंदणी होईल यासाठी पूर्ण कसोशीने प्रयत्न करा.
तुम्हाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा.
बाकी १९ मार्चला गुढी पाडव्याला शिवतीर्थावर आपली भेट होईलच , आणि तुम्ही सर्व महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून याल त्यामुळे मला तुमच्या रूपात महाराष्ट्र दर्शन देखील घडेलंच !
स्वतःची तसेच आपल्या परिवाराची आणि महाराष्ट्राची काळजी घ्या !
धन्यवाद !
आपला नम्र
राज ठाकरे
आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा.
आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्याचे संदर्भ आहेत. त्यात दिल्लीत एआय परिषद झाली त्या सगळ्याचे संदर्भ पण डोक्यात घोळत होते.
त्यातच अँथ्रोपिकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने जगभरात जी घुसळण सुरु केली आहे. त्या अँथ्रोपिकचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. राहुल पाटील ही मराठी व्यक्ती आहे ही पण बाब महत्वाची होतीच .
या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजवून घेतलं आणि त्यातून जे जाणवलं ते आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मांडत आहे.
आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे.
मध्यंतरी मला काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही.
दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर जमीन ही मोठी शक्ती ठरली. औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स ही मोठी शक्ती वाटायला लागली. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील.
आणि म्हणूनच माझे महाराष्ट्र सैनिक असोत की इतर मराठी जनांनी, मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा तयार होईल हे बघितलं पाहिजे.
यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रांत तज्ज्ञ असाल त्याचे मराठीत ब्लॉग्स सुरु करा, मराठी पॉडकास्टस सुरु करा. कम्प्युटरवर कोडिंग करण्यापासून ते मराठी भाषिकांनी सुरु केलेले डिजिटल विश्वकोश तयार होऊ देत. शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषय, ती प्रणाली कशी हाताळायची हे सगळं मराठीत मुलांना शिकवलं जावं. या सगळ्यातून मराठी भाषा ही डिजिटल जगातील ज्ञानाची वाहक बनेल आणि जितका मोठा डेटा (विदा ) या सगळ्या कृत्रिम बुद्धी प्रणालींना मिळेल तितकी ही सर्व सॉफ्टवेअर्स उत्कृष्ट संधी मराठीत उपलब्ध करून देतील.
आपण मराठी भाषा आणि मराठी प्रांत याच्या सार्वभौमत्वासाठी आवाज उठवत आलो आहोत, आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषेतून ज्ञान मिळ्वण्याबाबतचं सार्वभौमत्व मिळवणं शक्य आहे. ही संधी सोडू नका.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नोकऱ्या कमी होतील अशी भीती सर्वत्र बोलली जात आहे. ती सार्थ असेल देखील. पण नक्की काय घडेल याचा अचूक अंदाज कोणीच व्यक्त करू शकत नाही. पण एक असं तंत्रज्ञान तुमच्या हातात आलं आहे जे आत्मसात केलं तर पारंपरिक उधोगधंद्यात काहीसा मागे पडलेला मराठी माणूस स्वतःच खूप मोठं साम्राज्य उभं करू शकेल. आज जगातील अनेक बलाढ्य कंपन्या या गेल्या २० /३० वर्षांत उभ्या राहिल्या आहेत आणि ते जी संपत्ती निर्माण करत आहेत ते १०० वर्ष जुन्या उद्योगसमूहांना पण शक्य होत नाही. त्यासाठी डिजिटल जगात मराठी मोठ्या प्रमाणावर उमटेल हे पहा. समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका.
तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा.
राज ठाकरे ।
घरगुती वीज बिलात ‘व्हीलिंग चार्ज’ च्या नावाने राज्य सरकार जनतेकडून हजारो कोटींची वसूली करत आहेत.खरंतर संपूर्ण देशात सर्वात जास्त दर महाराष्ट्रात आहेत तरीही आपण ते मुकाट भरत आहोत कारण कोणी जाब विचारत नाही व जो जाब विचारतो त्याला अधिकार दिला जात नाही.
एका खिशातून थोडंसं द्यायचं,दुसऱ्या खिशातून दुप्पट ओढायचं ! बहिणीच्या ओवाळणीत पंधराशे,अन् वीज बिलात मात्र अंधार. कष्टकरी, मध्यमवर्ग महागाईने होरपळतोय,दुसरीकडे शेतकरी राजा संकटात तळमळतोय! रोजच्या खर्चात दिलासा देणं, हेच खरं सत्तेचं काम असतं !
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाशी केली.
ही अत्यंत निंदनीय बाब आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा तीव्र निषेध नोंदवत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी.
#MNSAdhikrut
महाशिवरात्रीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. महादेवांच्या आशीर्वादाने सर्वांना संपन्न, समृद्ध आणि आरोग्यदायी आयुष्य लाभू दे, हीच भगवान शंकरांच्या चरणी प्रार्थना.
८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.
या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती ! नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या !
असो . . .
मुळात भाषावार प्रांतरचना या देशात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच माहीत असावा असे आम्ही समजतो !
भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे.
दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहेत. तिकडे पश्चिम बंगाल असो, पंजाब असो अगदी गुजरात असो, तिकडे पण ही भावना आहे.
ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतली आहे का? जेंव्हा देशातील ४ / ५ राज्यातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यात जातात, तिकडे आगाऊपणा करतात, तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून, तिथल्या भाषेचा अपमान करतात, स्वतःचे मतदारसंघ तयार करतात, तेंव्हा स्थानिकांच्यात रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो. याला तुम्ही आजार म्हणणार? आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरातमध्ये पण पसरला आहे. गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेंव्हा पळवून लावलं तेंव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे का नाही दिलेत? असेच धडे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का नाही दिलेत ?
मराठी माणूस सहनशील आहे पेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबित कण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते. काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भय्याजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचं विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला. हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला फायदा कसा होईल हे पाहिलं. मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या भानगडीत मुळात पडायचंच कशाला?
संघाच्या कामाबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण म्हणून अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नये. आणि पडायचंच असेल तर देशभरात हिंदी (जी मुळात राष्ट्रभाषा नाही ) लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा आणि मग आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा.
आणि यात हिंदुत्व आणून आम्हाला ज्ञानामृत पाजायचा प्रयत्न करू नका. मी अनेकदा सांगितलं आहे की ज्या वेळेस हिंदूंवर हल्ला होईल तेंव्हा आम्ही हिंदू म्हणून आमच्याकडून जे काही करणं शक्य होईल ते आम्ही करूच ! रझा अकादमीच्या दंगलीविरोधात मोर्चा काढणारा आणि मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करणारा, तसेच हिंदू सणांच्या वेळी मोठमोठ्याने लाऊडस्पीकर लावणे आणि मोठमोठ्याने डिजे लावून नागरिकांना त्रास होत असताना त्या विरोधात भूमिका घेणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष होता. जे चूक ते चूकच हे आम्ही ठासून बोलतो. तसं मोहनराव आपण कधी बोलणार ? हिंदुत्वाच्या नावाखाली देशभरात जो धिंगाणा सुरु आहे , उत्तर भारतात कावड यात्रांमधे बिभत्स पद्धतीने महिलांना नाचवले जाणे , तसेच २०१४ ला बीफ एक्सपोर्ट मधे जो आपला देश ९ व्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे आणि त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार? त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार?
असो. तुम्ही काय करावं हे तुमच्यापाशी. आमच्यासाठी मराठी भाषा आणि मराठी माणूस हे अंतिम सर्वोच्च प्राधान्य आहे.
या देशात भाषिक आणि प्रांतिक अस्मिता या राहणारच, तशाच त्या महाराष्ट्रात देखील राहणारंच ! हे आमचं स्वत्व आहे आणि त्याबद्दल जेव्हा जेव्हा असे प्रसंग उभे राहतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र त्वेषाने उभा राहील !
राज ठाकरे ।
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकश्या होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रशासन घेतं का? हा प्रश्न आहे.
मंगळवार ३ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का? स्व. बाळासाहेबांच्या प्रेरणेतून हा द्रुतगती मार्ग उभा राहिला, त्याला २४ वर्ष उलटली. पण या काळात काय काय आपत्ती येऊ शकते ना याचा विचार केला गेला ना संपूर्ण रस्ता उत्तम दर्जाचा राहील हे पाहिलं गेलं. मधल्या काळात एकच गोष्ट तत्परतेने केली गेली ती म्हणजे टोल वसुली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं टोलचं आंदोलन हे टोल घेण्याच्या बाबतीतलं नव्हतंच. ते होतं जर टोल घेता, तर मग सरकार, टोल वसूल करणारी कंपनी काय सुविधा प्रवाशांना देते याबद्दलचं. कालच्या घटनेनंतर हाच प्रश्न आहे की, रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?
परवाच्या अर्थसंकल्पात मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनची घोषणा केली गेली. ती होईल तेंव्हा होईल. पण त्या आधी मुंबई-पुणे प्रवास सुरळीत करा.
हल्ली मुंबई-पुणे प्रवास हा नक्की किती तासांत होईल याबद्दल कोणीच शाश्वती देऊ शकत नाही. मुंबई आणि पुणे ही या राज्याच्या आणि देशाच्या विकासाची इंजिनं आहेत असं एका बाजूला म्हणायचं आणि ३२ तास या दोन शहरांतील वाहतूक ठप्प होते याकडे स्वस्थपणे बघायचं यासाठी लागणारा कोडगेपणा अनाकलनीय आहे.
ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल केला गेला तो सरकारने त्यांना परत केला पाहिजे. आणि चौकश्यांचा फार्स न करता या घटनेसकट इतर काय घटना घडू शकतात आणि त्यावर तात्काळ उपाय कसा केला जाऊ शकतो याचा कृती आराखडा तयार करून लोकांसमोर ठेवला पाहिजे. सरकारमध्ये पालकमंत्री असतात आणि या सरकारमध्ये तर पालकमंत्री पदावरून वाद सुरु असतात. पालकत्वाची इतकी आस असलेलं सरकार असून सुद्धा नागरिकांना निराधार वाटावं अशी परिस्थिती का येत आहे याचा सरकारने विचार करावाच.
राज ठाकरे ।
राज ठाकरेंच्या अभ्यासपूर्ण भाषणावर जर भाजपचे मराठी कुत्रे भुंकणार असतील तर थू तुमच्या जिंदगीवर !! इतकं सत्य समोर येऊनही जर मुंबईकरांनो तुमचे डोळे उघडणार नसतील, तर तुमचं नशीब तुम्हालाच लखलाभ..!! #RajThackeray
राजसाहेब ठाकरे यांनी नेहमीच आपल्या भाषणांमधून स्पष्टपणे सांगितले आहे की, महाराष्ट्रातील काही राजकीय पक्ष जाणूनबुजून उत्तर भारतीयांचा मतदारसंघ तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच हा एक ठळक आणि निर्विवाद पुरावा — सर्वांनी जरूर पाहावा.
#MNSAdhikrut